काला पत्थर
काल 'काला पत्थर' शेवटची अठ्ठावीस मिनिटे सोडून पाहिला. त्यात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, राखी, परविन बाबी, नीतू सिंग एवढी दणदणीत स्टार कास्ट आहे. शत्रुघ्नचे बरेचसे संवाद "बाळ - राकु" गटात येणारे वाटले. मंगलका खून कोई ऑरेन्ज कोला (?) नहीं है, जो विजय एक झटकेमें पी जाये. एकदम राकु रिअलायझेशन झाले पण राकु सारखे कोणी नाही. गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु. त्यामुळे शत्रु फक्त भक्त वाटतो, देव नाही.
अमिताभचे संवाद तर जीएंच्या व्यक्तिरेखांचे संवाद वाटावेत इतके विमनस्क व हताश आहेत. त्याचा पूर्वेतिहास - एका जहाजाचा कॅप्टन असतो ते जहाज दुर्दैवाने बुडताबुडता वर येऊन बसते, त्याने ह्याचे आपल्या जहाजाला सोडून दिलेला भ्याड कॅप्टन म्हणून कोर्ट मार्शल होते व तो जीए- धर्म स्विकारून एकदम शब्दशः 'भूमिगत' होऊन कोळशाच्या खाणीत मजूर होतो. हमारी कश्ती वहां डुबी जहाँ पानी कम थाच्या- उलट हमारी कश्ती वहां आपोआपच बाहर आई जहां पाणी का वावटळ था.
शशी कपूर जरा नॉर्मल आहे, तो प्रेमात पडतो फ्लर्ट करतो गाणी गातो, कोळशाचे सारखेच - दोन्ही काळे असलेले प्रकार सांगतो. विनाकारण कन्हतकुथत नाही, जमेल तसा खाणीचा इंजिनिअरही होतो. प्रेम चोप्रा सगळीकडेच जसा असतो तसा आहे. राखी नेहमीच नर्चरिंग टाईप भूमिका असतात, इथे पण ती डॉक्टर आहे. अमिताभ एकदम पाप्याचं पितर दिसतो यात, तो मारतोय तर मार खाणाऱ्याला लागतेय हे फक्त त्याच्या डोळ्यातल्या आगीवरून समजून घ्यायचे. भाभु सारखा एक चहाचा दुकानदार व सर्व खबरा सर्वांपर्यंत पोचत्या करणारा बडबडा माणूस आहे.
अमिताभ उंचच्याउंच दिसतो, लांबलांब ढांगा टाकत चालतो, तोंडाला सतत काळं फासलेल्या अवस्थेत आहे. परिक्षीत सहानीची गाणी अमाप आणि कंटाळवाणी वाटली, तो दिसलारेदिसला की फाफॉ केले.
चित्रपट एन्जॉय केला खूप. बऱ्याच दिवसांनी टिपिकल मसालेदार व जुना पिक्चर पाहिला. संवाद जबरदस्त आहेत, मी तर आता काय करतात बघू म्हणत परीक्षा बघण्यासाठी सबटायटल्सही वाचले. संवाद नुसते जबरदस्तच नाहीत तर प्रत्येक पात्र वेगवेगळे एस्टाब्लिश करण्यात संवादांचा हात आहे व त्याने सगळे प्रॉमिनन्टली उठून दिसतात.नीतू सिंगचा रोलही खूप हाय एनर्जी - बांगड्या, अंगठ्या विकणाऱ्या बाईचा आहे. परविन पत्रकार आहे, राखी डॉक्टर आहे. तरीही गावातील एका लग्नात त्यांच्या त्यांच्या क्लासनुसार त्या त्या वेशभूषेत तिघींचं एक गाणंही आहे.
राखी व विजय पावसात कुणालातरी इंजेक्शन द्यायला जातात, पाऊस व अंधार असल्याने तिचा पाय घसरून ती त्याच्या सेमी - मिठीत पडते. तर ते शत्रुघ्न मस्त आपल्या घरातील बाजेवरून पडल्यापडल्या पाहतो, इतका 'स्ट्रेटफोरवर्ड' शॉट आहे. मग ती अमिताभला म्हणते की मला तर अंधारात काही दिसत नाही. तुला कसं दिसतं तर याचं माझ्या जीवनातच अंधार आहे , त्यामुळे मला कुठेही दिसतं - टाईप विमनस्क "जीए-स्पीच" सुरू होते. भारी डायलॉग आहेत पण, थेरपी द्या याला कुणीतरी वाटतं आपल्याला, म्हणजे भारीच की.
एक मिनिटही बोअर होत नाही, खूप ड्रामा आहे. विजय पूर्वाश्रमीचा इतका उच्चभ्रू निघेल असे न वाटल्याने धक्का बसला. मी बहुतेक पूर्ण विसरून गेले होते हा सिनेमा. शरत सक्सेना एवढा प्राचीन आहे हेही नवलच.
नवीन भर - पूर्ण केला आहे. संजीव कुमार पुन्हा आलाच नाही. पाहुणा कलाकारच होता. खाणीत पाणी जाऊन खाणकामगारांचा जीव धोक्यात आलेला असताना विजयने आपले कोर्ट मार्शलचे पाप ह्याच पाण्यात धुवून घेतले. शशी कपूर त्याला 'तू जा तुझा जीव वाचव, माझा पाय दगडाखाली अडकलेला आहे. मी काही आता वाचत नाही' म्हणतो तर हा 'जीव तर एकदा वाचवून झाला आहे, आज आत्म्याला वाचवायचे आहे' म्हणतो. एवढ्या गोंधळात एक तुटलेला दगड थर्माकोल उघडे पडून रामसेतूतल्या दगडांप्रमाणे तरंगत इकडून तिकडे गेलेला दिसला. परिक्षीत सहानीचा खटारा ट्रक बंद पडून (तो 'पुली' करून यांना ओढत असतो) यांची लिफ्ट खाणीत अडकते व तो वाहेगुरूंचे नाव घेताच खटारा ट्रक चालू लागून त्याच्या मदतीने शशी व अमिताभ बाहेर येतात. मॅकमोहन पत्त्यातली दुर्री घेऊन फक्त वाहून गेला, पण तेवढं चालायचंच.
संपली आमची गोष्ट. आता आपापलं प्राईमवर पाहा.
https://www.maayboli.com/node/86233?page=36
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा